कामठी तालुक्यातील बिना संगम येथील हत्याकांडाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
लायटरवादातून खूनप्रकरणी चौघांना अटक
सारथी महाराष्ट्राचा न्यूज/ सावनेर तालुका प्रतिनिधी :- नरेश गें कनोजे
खापरखेडा : सिगारेट
पेटविण्यासाठी लायटर देण्यावरून झालेल्या वादातून ३३ वर्षीय तरुणाची निघृण हत्या झाल्याची घटना २३ नोव्हेंबर २५ रोजी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिना संगम परिसरात घडली होती. या प्रकरणाचा नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ ने पर्दाफाश करून चारही आरोपींना अटक केली.
अटक आरोपींमध्ये आकाश संतोष परिहार (२०, रा. बजरंग चौक, शांतीनगर), मितांशू उर्फ लक्की तुषार बुलकुंडे (२०, रा.इतवारी रेल्वे क्वार्टर्स), मनीष पांडुरंग बावणे (१९, रा. बजरंग चौक) आणि राहुल रोशन कावळे (२१, रा. बजरंग चौक, शांतीनगर) यांचा समावेश आहे. २३ नोव्हेंबर रोजी पिवळी नदी परिसरातील रहिवासी सुशीलकुमार गेडाम, आशिष गोंडाणे (३३) आणि सचिन मिश्रा हे तिघे बिना संगम येथे फिरण्यासाठी आले होते. काही वेळाने सचिन कामानिमित्त निघून गेला. त्यादरम्यान आशिष आणि सुशीलकुमार नदीत पोहून परत येत असताना आरोपी तेथे पोहोचले. त्यांनी या दोघांकडे सिगारेटसाठी लायटर मागितले. लायटर दिल्यानंतरही आरोपींनी
शिवीगाळ करत वादाला सुरुवात केली. सुशीलकुमार आणि आशिष यांनी विरोध करताच आरोपींनी दगडाने मारहाण केली. हल्लेखोरांनी सुशीलकुमारवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले, तर आशिष गोंडाणेवर सपासप वार करून त्याची हत्या केली. घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली होती. प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ ने हाती घेतला. माहितीच्या आधारे पथकाने एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इतर साथीदारांची
नावे उघड केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून चार आरोपींना अटक केली. या आरोपींना पुढील कारवाईसाठी खापरखेडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश रूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, डीसीपी राहुल माकणीकर आणि एसीपी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डिमे आणि त्यांच्या पथकाने केले



