दौंड प्रतिनिधी :~ दत्तात्रय दिलीप यादव
पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी कल्याणकारी संघटना – महाराष्ट्र राज्य यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि सेवानिवृत्ती वयोमर्यादा वाढविणे या प्रमुख मागण्यांसाठी मागील काही महिन्यांत शासनाला मार्च २०२५, मे २०२५ आणि जुलै २०२५मध्ये तसेच त्यानंतरही वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
संघटनेच्या मते, २००३ पूर्वी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांकडून तीन वर्षे मानधन तत्वावर (३०० रुपये) सेवा घेण्यात आली होती. त्यानंतर सरळ सेवेत समाविष्ट करणे आवश्यक असताना शासनाने तो निर्णय लागू केला नाही. पुढे २००९ मध्ये १० टक्के आरक्षण जाहीर करून वेळोवेळी वयोमर्यादा वाढविणारे निर्णय काढण्यात आले. मात्र, ५५ वर्षांच्या मर्यादेमुळे या कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष सेवा ३ ते १२ वर्षांपर्यंतच मर्यादित राहत असून, हा स्पष्ट अन्याय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
तसेच आंध्र प्रदेश शासनाच्या परिपत्रकाचा दाखला देत सेवा-वाढ देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
साताऱ्यात सरळ सेवा भरती; इतर जिल्ह्यांत अंमलबजावणी नाही
मा. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार २००४ मधील शासन निर्णयाप्रमाणे सातारा जिल्हाधिकारी यांनी २००६ मध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची सरळसेवेतील भरती केली होती. तथापि, महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, ही मोठी विसंगती असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र असतानाही वंचित
फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जाहिरात असलेल्या भरतीस जुनी पेन्शन योजना लागू होणे आवश्यक आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी त्या कालावधीतलेच असल्यामुळे त्यांना जुनी पेन्शन मिळणे अपेक्षित असताना आजतागायत ती मंजूर करण्यात आली नाही.
निवडणुकीत सज्ज; राज्यभरात २०–२५ हजार नावे नोंदणी
शासन व प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने सर्वानुमते ठरविले आहे की, येणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेच्या वतीने उमेदवार उभे केले जातील. पुणे, संभाजीनगर व नागपूर या तीनही विभागांत संघटना उमेदवार उतरवणार आहे.
या संदर्भात संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. जनार्धनजी काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली असून अंदाजे २० ते २५ हजार नवीन नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती संघटनेने दिली. या कार्यासाठी संघटनेतील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे काळे यांनी विशेष कौतुक केले आहे.



