दौंड (प्रतिनिधी): दत्तात्रय यादव
एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे कांदा तसेच इतर पिकांना मिळणारा कवडीमोल बाजारभाव यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच आता रासायनिक खतांच्या किमतीत प्रति गोणी २०० ते २५० रुपयांची भर पडल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षभराचा विचार करता खतांच्या किमतीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.
खतांचे दर: तुलनात्मक आढावा (प्रति गोणी)
खतांच्या किमतीत झालेली वाढ खालील तक्त्यावरून स्पष्ट होते:खताचा प्रकार
मागील वर्षाचा दर(₹)सध्याचा दर(₹)वाढ (अंदाजे)
10:26:26 १२२० २१०० ८८०
14:35:14 १२५० २१५० ९००
15:15:15 १३४० १६५० ३१०
पोटॅश (Potash) ११०० १८५० ७५०
24:24:0 १२८० २१०० ८२०
12:32:16 १२५० २०५० ८००
9:24:24 १९०० २१०० २००
सबसिडीला कात्री अन् टंचाईचे सावट
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळापासून खतांवर दिली जाणारी सबसिडी (अनुदान) शेतकऱ्यांसाठी मोठा आधार होती. मात्र, गेल्या १०-१२ वर्षांत केंद्र सरकारने हे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करण्यास सुरुवात केली आहे. शासनावर सबसिडीचा आर्थिक भार वाढत असल्याचे कारण देत खत पुरवठ्यावरही मर्यादा आणल्या जात आहेत. यामुळे बाजारपेठेत खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होत असून, वाढत्या किमतींमुळे सामान्य शेतकऱ्याचे शेतीचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
शेतकरी आक्रमक: “शेती करायची कशी?”
”शासनाचे चुकीचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. डिझेल, बियाणे आणि आता खतांचे दर गगनाला भिडले आहेत, पण उत्पादनाला भाव मिळताना दिसत नाही. असेच दर वाढत राहिले, तर शेती करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल,” अशी संतप्त प्रतिक्रिया दौंड परिसरातील जाणकार शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
शासनाने या दरवाढीवर नियंत्रण मिळवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेती व्यवसाय पूर्णपणे तोट्यात जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.




