तेल्हारा – तालुक्यातील बेलखेड मुख्य रस्त्यालगत असलेल्या सर्वे नं. ७९१ मधील शेतकरी अशोक पुंडलिक धुमाळे यांच्या ऊसाच्या शेतात विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली.
या आगीत ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बोअरवेल केबल, स्प्रिंकलर पाईप व इतर सिंचन साहित्य जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आग वाढत असल्याने तेल्हारा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
नगराध्यक्षा सौ. वैशाली ताई जितेंद्र पालीवाल यांच्या सूचनेनुसार अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे शेजारील उर्वरित ऊस पीक वाचले व संभाव्य मोठे नुकसान टळले.
दरम्यान, या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून मदत द्यावी, तसेच संबंधित वीज विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.









