चामोर्शी (गडचिरोली), दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले आदर्श प्रशासक, न्यायप्रिय शासक आणि जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर लोकनेते होते, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.
श्री छत्रपती राजे जगदंब नवयुवक मंडल, चुरमुरा यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ब्राह्मणवाडे पुढे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली. त्यांच्या कार्यातून लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचे दर्शन घडते. आजच्या तरुण पिढीने शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्य, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गडचिरोली काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष वसंत राऊत, मुखरू पा. देशमुख, कवडूजी म्हस्के, अंकित सातपुते, मोंटू रामटेके, भूपेंद्र काळबांदे, अनिल मोरांडे, श्रावण उईके, तुळशीराम मोरांडे, महेश मेश्राम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महिला मंडळाच्या सदस्यांसह युवक-युवती आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.







