रिसोड – प्रतिनिधी
रिसोड ते साखरा जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहनचालक, विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. साखर फाटा ते आगरवाडी दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
दररोज या मार्गावरून शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी तसेच व्यावसायिकांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून अपघाताची भीती कायम निर्माण झाली आहे. दुचाकीस्वारांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडून गेला असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
नागरिकांनी या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे निवेदने देऊनही अद्याप कामास सुरुवात झालेली नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. राज्यातील इतर भागांत महामार्गांची कामे वेगाने सुरू असताना आपल्या भागातील या महत्त्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास ‘शोले’ चित्रपटातील शैलीत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.








