पनवेल – कळंबोली ता. प्रतिनिधी :
पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर 4ई परिसरातील केएल–४ भागात १५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असून शेकडो कुटुंबांवर अक्षरशः पाणीबाणी ओढवली आहे. नळ कोरडे, टाक्या रिकाम्या आणि घराघरांत पाण्याच्या डब्यांच्या रांगा अशी भीषण स्थिती गेल्या आठ दिवसांपासून कायम आहे. वारंवार तक्रारी करूनही सिडको प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना घरात पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल होत आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका विजया कदम यांनी थेट सिडकोच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली. “१५ फेब्रुवारीपासून केएल–४ मध्ये पाणी नाही, तरी प्रशासन झोपेत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतरच सिडकोने जलवाहिन्यांमध्ये अडथळा शोधण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समजते.
केएल–४ परिसरातील कंपाउंड 17 ते 24 आणि 25 ते 32 या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. जलवाहिन्यांमध्ये काथ्या अडकल्यामुळे अडथळा निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी इतके दिवस तो शोधण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
दररोज सकाळ-संध्याकाळ पाण्याच्या प्रतीक्षेत नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. काहींनी खासगी टँकरवर अवलंबून राहण्यास सुरुवात केली आहे; मात्र त्याचा आर्थिक भार सर्वसामान्यांवर पडत आहे. दूषित पाण्याचा प्रश्न यापूर्वीही वारंवार समोर आला होता. तरीही सिडकोकडून कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
स्थानिक महिलांनी आपली व्यथा स्त्रीशक्ती फाउंडेशनकडे मांडल्यानंतर विजया कदम यांनी तात्काळ सिडको पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांशी संपर्क साधला. “बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणे ही प्रशासनाची गंभीर चूक आहे. याला जबाबदार कोण असा थेट प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सिडकोकडून ठिकठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले असून जलवाहिन्यांमधील अडथळा शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तोपर्यंत संबंधित भागाला तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्त्रीशक्ती फाउंडेशनने केली आहे.
याप्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही विजया कदम यांनी दिली आहे.








