📍 लांझी-हिरापूर, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लांझी-हिरापूर येथे विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे दोन कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा मुख्य आधार हरपला असून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक म्हैस अनिल गवळी यांच्या मालकीची तर दोन म्हशी सोमनाथ रामदास पवार यांच्या मालकीच्या होत्या. दुग्ध व्यवसायावर कुटुंबाचा खर्च भागवणाऱ्या या शेतकऱ्यांवर अचानक मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पशुधन हाच ग्रामीण भागातील कुटुंबांचा आधार असल्याने या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल अधिकारी भगवान खांडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच उपसरपंच योगेश आरगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य रवि मनगटे, नंदू सोनवणे, बाबासाहेब आरगडे, सचिन जमधडे व अक्षय भवर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पीडित कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी परिस्थितीची सविस्तर माहिती घेत महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामा प्रक्रिया जलद पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला.
ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त करत शासनाकडे तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. “ग्रामीण भागात पशुधन हेच कुटुंबाचे बळ असते. एका क्षणात तीन म्हशी दगावल्याने या कुटुंबांवर मोठे संकट आले आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
पीडित शेतकऱ्यांनीही प्रशासनाकडे मदतीची याचना करत, “आमचा उदरनिर्वाह पूर्णपणे दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. भरपाई मिळाल्यास आम्हाला मोठा आधार मिळेल,” अशी व्यथा मांडली.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात वीज पुरवठा यंत्रणेची तपासणी करून सुरक्षितता उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नेतृत्वाने “गावातील कोणतेही कुटुंब संकटात असताना आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू,” असे आश्वासन देत शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे सांगितले. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे पीडित कुटुंबांना काहीसा दिलासा मिळाला आहे.







