
स्वच्छ जल, स्वच्छ मन’ उपक्रमातून जलरक्षणाचा संदेश
आजरा (प्रतिनिधी):
‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हा उदात्त विचार घेऊन संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हा देशव्यापी उपक्रम रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडला. सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण देशभरात १५०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी राबवण्यात आला. याच मोहिमेचा एक भाग म्हणून आजरा तालुक्यातील मौजे भादवण येथील पिण्याच्या पाण्याचे तळे आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन व उपस्थित मान्यवर
या उपक्रमाचे उद्घाटन आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी चादवण गावच्या सरपंच सौ. माधुरी गाडे, उपसरपंच श्री. संजय पाटील, संत निरंकारी मंडळ (शाखा आजरा) चे मुखी महात्मा श्री. भिकाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसहभागातून जलस्त्रोतांचे संवर्धन
या मोहिमेअंतर्गत संत निरंकारी सेवादल आणि साधसंगत यांच्या सहकार्याने भादवण येथील सार्वजनिक तलाव आणि त्याभोवतीचा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. “पाणी हेच जीवन असून त्याचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे,” असा संदेश या लोकचळवळीतून देण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सरपंच सौ. माधुरी गाडे यांनी निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले. समाजामध्ये केवळ शब्दांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून संदेश देणाऱ्या अशा मिशनची आज नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उपसरपंच श्री. संजय पाटील यांनीही भविष्यात अशा उपक्रमांचे महत्त्व व फायदे दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
सेवादलाचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुखी महात्मा श्री. भिकाजी पाटील यांनी केले. या मोहिमेत सेवादल संचालक श्री. संजय शेवाळे, सेवादल शिक्षक श्री. पांडुरंग धडाम, सहाय्यक शिक्षक श्री. तुळशीराम चव्हाण, महिला क्षेत्रालिका सौ. वर्षा भडांगे, शिक्षिका सौ. सविता सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने सेवादल सदस्य, महात्मा, माता-भगिनी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदिप फगरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. भिकाजी पाटील यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विजय भडांगे (निरंकारी मंडळ, शाखा आजरा) यांनी विशेष परिश्रम घेतले.








