
चंदगड : संत निरंकारी मिशनच्या वतीने प्रोजेक्ट अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन या अभियानाअंतर्गत चंदगड नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक पाण्याच्या टाक्यांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. “प्रदूषण अंदर हो या बाहर, दोन्ही हानिकारक असते” या वचनानुसार पाणी, हवा व ध्वनी प्रदूषण रोखण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमातून निसर्ग स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच मनातील वैर, विरोध, इर्षा, निंदा व नफरत दूर करून प्रत्येकाच्या मनात प्रेम, नम्रता, सहनशीलता व मानवता टिकवण्याचा संदेश देण्यात आला. संत निरंकारी मिशन जगभर स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन चंदगड नगरपंचायतचे नगराध्यक्ष आदरणीय श्री. सुनील काणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. राजश्रीताई गावडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण गावडे, झांबरे गावचे सरपंच श्री. विष्णू गावडे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, कामगार वर्ग, सजग नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संत निरंकारी मंडळ शाखा नागणवाडीचे मुखी श्री. मधुकर शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच सेवादल शिक्षक श्री. नारायण पवार, संचालिका सौ. नवकांता भोगण, शिक्षिका सौ. संगीता चंदगडकर यांच्यासह तालुक्यातील साधसंगत व सेवादल बंधू-भगिनींची लक्षणीय उपस्थिती लाभली.









