
रसूल शेख
नायगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान
नायगाव तालुका येथे सोमवारी (दि. २३) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीस आलेली ज्वारी, गहू, हरभरा, तूर व टरबूज ही पिके जमीनदोस्त झाली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सोमवारी अचानक आभाळ दाटून येत वारा सुटल्याने उभी पिके आडवी पडली. हरभऱ्याचे वाळलेले घाटे गळून पडले, तर गव्हाच्या ठुशीत पाणी शिरल्याने नुकसान वाढले. अनेक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांच्या खळ्यांनाही फटका बसला.
हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सरकारने चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या नुकसानीची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी गजानन पाटील होटाळकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नायगाव यांनी केली आहे.



