
नितेश गट्टीवार गडचिरोली(चामोर्शी) दि.७ मार्च राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा फक्त उद्योजकांना खुश करणारा आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असल्याची टीका छात्रभारतीचे माजी राज्य उपाध्यक्ष उमेशभाऊ उईके यांनी केली आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारच्या अनेक घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.उमेशभाऊ उईके म्हणाले की, निवडणुकीच्या जाहीर सभांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पामध्ये केवळ दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून त्यालाही विविध अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा नसून त्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असल्याची टीका त्यांनी केली.तसेच शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये ठोस आणि परिणामकारक तरतूद करण्यात आलेली दिसत नाही. वाढत्या महागाईच्या काळात शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या योजनांची अपेक्षा होती. मात्र सरकारने शिक्षण क्षेत्राकडे पुरेसे लक्ष दिले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे उईके यांनी सांगितले.अर्थसंकल्पामध्ये विविध समाजातील महापुरुषांच्या नावाने अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु त्या योजनांसाठी आवश्यक असलेल्या निधीची स्पष्ट तरतूद दिसत नाही. त्यामुळे या योजना केवळ घोषणांपुरत्याच मर्यादित राहण्याची शक्यता असून, जनतेच्या भावनांचा केवळ राजकीय वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली.आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याबाबतही उमेशभाऊ उईके यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील युवकांसाठी सुमारे 70 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच गडचिरोलीला “स्टील हब” म्हणून विकसित करण्याचेही सांगितले जात आहे. मात्र जिल्ह्यात येणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या किंवा रोजगाराच्या संधी मिळणार याबाबत अर्थसंकल्पात साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.एकूणच पाहता हा अर्थसंकल्प युवा बेरोजगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलेला आहे. मोठ्या घोषणा आणि आकर्षक शब्दांच्या आड प्रत्यक्षात ठोस उपाययोजना नसल्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी फसवा ठरत असल्याची प्रतिक्रिया छात्रभारतीचे माजी राज्य उपाध्यक्ष उमेशभाऊ उईके यांनी व्यक्त केली.







