
नितेश गट्टीवार चामोर्शी (गडचिरोली): दि.९ मार्च तालुक्यातील भेंडाळा परिसरात सुरू असलेल्या शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनाला एनएसयुआय ने आक्रमक जाहीर पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याच्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या या लढ्याला एनएसयुआय चे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट मैदानात उतरून साथ देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या संमतीशिवाय अधिग्रहित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण करणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर एनएसयुआय ने शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनाला ठाम पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कोणत्याही निर्णयाला एनएसयुआय कडून जोरदार विरोध केला जाईल, असा इशारा एनएसयुआय जिल्हाध्यक्ष गडचिरोली राहुल वैरागडे यांनी म्हटला आहे. “शेतकऱ्यांचा लढा हा आमचा लढा आहे, अन्याय सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. या प्रसंगीसमिती अध्यक्ष मनोज पोरटे, सुनील कन्नाके,दिगंबर धानोरकर, लोमेश भगत, जानकीराम पोरटे, गोपाल चलाख, तेजस कोंडेकर, अनिल चौधरी , नामदेव किनेकर, समस्त गावकरी व समिती सर्व पदाधिकारी उपस्थित होते.










