
आजरा: सारथी महाराष्ट्राचा न्यूज,
निसर्ग संवर्धन आणि वृक्षारोपण क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘वृक्ष प्रेमी समूह’ सदस्यांनी नुकतीच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) माननीय कार्तिकेयन साहेब यांची ‘मृत्युंजयकर शिवाजी सावंत सभागृह’ येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील पर्यावरणाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून त्यांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.
वणवा आणि वृक्षतोडीबाबत चिंता व्यक्त
भेटीच्या सुरुवातीला समूहाच्या वतीने करण्यात येत असलेल्या सामाजिक आणि पर्यावरणीय कार्याची माहिती कार्तिकेयन साहेबांना देण्यात आली. सध्याच्या काळात जंगलांना आणि डोंगररांगांना वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे. या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
रस्ता रुंदीकरणात प्राचीन वृक्ष वाचवण्याचे आवाहन
विशेषतः हलकर्णी, चितळे धनगरवाडा, वाटंगी फाटा ते महागाव या रस्ता रुंदीकरणाच्या कामात अनेक वर्षांपासूनचे प्राचीन आणि देशी वृक्ष तोडले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, “प्रशासनाने विकासकामे करताना हे प्राचीन वृक्ष जास्तीतजास्त कसे वाचवता येतील, यावर भर द्यावा,” असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले. तसेच, अपरिहार्य कारणास्तव जी वृक्षतोड होईल, त्याची भरपाई म्हणून केवळ नवीन वृक्ष लागवड न करता, त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन आणि जोपासना करण्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मा. सुधीरभाऊ देसाई, सुभाष विभूते, डॉ. गौरी भोसले, पुष्पलता घोळसे, ए. के. पावले, चंद्रशेखर बटकडली आणि इतर वृक्ष प्रेमी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय सीईओ यांनी वृक्ष प्रेमींच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि मांडलेल्या प्रश्नांवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


