विनोद वांढरे (भद्रावती, तालुका प्रतिनिधी)

भद्रावती:
तालुक्यातील चंदनखेडा गावात सध्या एक वेगळंच वास्तव पाहायला मिळत आहे. गावात दिवस-रात्र अवैध देशी दारूची विक्री सुरू असून, कायद्याची भीतीच उरलेली नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गावात पाऊल टाकताच दारू सहज उपलब्ध होते. काही ठिकाणी तर इतक्या उघडपणे विक्री सुरू आहे की, जणू हा व्यवसाय अधिकृतच आहे असे भासते. विशेष म्हणजे, बसस्टॉप परिसरातच दारू विक्री होत असल्याने प्रवाशांनाही याचा थेट सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक सांगतात की, “इथे वेळेचं कोणतंही बंधन नाही. सकाळ असो किंवा मध्यरात्र — दारू मिळणारच!” त्यामुळे चंदनखेडा गावाला आता उपरोधिकपणे “२४ तास दारू बाजार” अशी ओळख मिळू लागली आहे.अलीकडेच वरोरा येथे बनावट दारूचा साठा जप्त झाल्याच्या घटनेमुळे या प्रकाराकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. चंदनखेड्यातही अशाच प्रकारचा मोठा गैरप्रकार सुरू असण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम गावातील युवक, विद्यार्थी आणि महिलांवर होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. वाढती व्यसनाधीनता आणि बिघडत चाललेले सामाजिक वातावरण ही चिंतेची बाब बनली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी वाढत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून या अवैध धंद्यावर लगाम घालावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
चंदनखेड्यात सुरू असलेला हा ‘मुक्त दारू व्यवहार’ थांबणार का, की कायदा फक्त कागदावरच राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




