दापोली/केळशी :रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भारजा नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक वारसा लाभलेले केळशी गाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला चैत्र महिन्यात मोठ्या भक्तिभावात सुरुवात होत असून, चैत्र पौर्णिमेला होणारा भव्य रथोत्सव हा या यात्रेचा मुख्य आकर्षण ठरणार आहे.

चैत्र शुद्ध अष्टमीपासून सुरू होणारा हा उत्सव पौर्णिमेपर्यंत चालतो. या कालावधीत गावात धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवीचा रथ गावातून मोठ्या उत्साहात मिरवला जातो. रथ गावातील प्रत्येक वाड्या-वस्तीतून फिरत असताना घरोघरी देवीचे पूजन केले जाते आणि हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.

केळशी येथील महालक्ष्मी मंदिराला पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा लाभला असून सुमारे अठराव्या शतकात उभारले गेलेले हे मंदिर कोकणातील प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. स्थानिक परंपरेनुसार या यात्रेदरम्यान आठ दिवस देवीचा जागर केला जातो. देवीची मूळ मूर्ती सोन्याची असल्याचा समज भाविकांमध्ये प्रचलित आहे.

अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत वसलेले केळशी गाव, परिसरातील वाळूचे डोंगर आणि शांत निसर्गरम्य वातावरणामुळे यात्रेच्या काळात भाविकांसह पर्यटकांची ही मोठी गर्दी होते. श्रद्धा, परंपरा आणि कोकणी संस्कृतीचा संगम असलेली ही यात्रा कोकणच्या सांस्कृतिक जीवनाचे जिवंत दर्शन घडवते.

या सोबतच मुंबई,पुणे यांसारख्या मोठ्या शहरां मधूनही हजारो भक्त विशेषतः या रथोत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी केळशीमध्ये हजेरी लावतात. काही जण कुटुंबासह मुक्काम करून पारंपरिक सोहळ्यांचा अनुभव घेतात, तर अनेक भक्त नवस पूर्ण करण्यासाठी येथे आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळे केळशीची ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा न राहता राज्यभरातील भाविकांना एकत्र आणणारा श्रद्धेचा उत्सव ठरतो.
चैत्र पौर्णिमेला केळशीत आई श्री महालक्ष्मीचा भव्य रथोत्सव;अरबी समुद्र किनाऱ्यावर रंगणार श्रद्धेचा महासोहळा







