जालना प्रतिनिधी :-
भोकरदन तालुक्यात गुढीपाडवा व नववर्षाच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. सुरंगलीसह तालुक्यातील अनेक भागांत या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे.
गहू, हरभरा, मका यांसारखी काढणीस आलेली पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या गंजी ताडपत्री टाकून वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी हे पीक पाण्यात भिजून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे उभे असलेले मका पीकही मोठ्या प्रमाणात आडवे झाले आहे. गहू हे नाजूक पीक असल्याने अनेक ठिकाणी गव्हाचे पीक पूर्णतः जमिनीवर कोसळले आहे. याशिवाय कांदा, ज्वारी, बाजरी व इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
यावर्षी चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र, या अचानक आलेल्या वादळ आणि गारपिटीमुळे तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून जोर धरत आहे.





