शहादा, दि. २२ (प्रतिनिधी) 🖊️
ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत शहादा तालुक्यातील म्हसावद येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांना विविध दाखले, सातबारा दुरुस्ती तसेच शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यात आला.
या शिबिरात सहायक जिल्हाधिकारी Krishnakant Kanwariya यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. बालविकास विभागातर्फे नवजात शिशूंना बेबी केअर किट देण्यात आले, तर ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ मोहिमेअंतर्गत वैष्णवी बागले या विद्यार्थिनीचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
मार्गदर्शन करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने थेट जनतेच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गोरगरीब नागरिकांची कामे प्राधान्याने मार्गी लावावीत.
शिबिरातील ठळक कामगिरी:
- एकूण २४१ दाखल्यांचे वितरण (४० राष्ट्रीयत्व, १२ जात, १५४ उत्पन्न, ३५ नॉन-क्रीमीलेअर)
- १७० मयत खातेदारांचे वारस नोंद ‘जिवंत ७/१२’ मोहिमेतून पूर्ण
- ६५ नवीन प्रकरणांना मंजुरी – संजय गांधी निराधार योजना
- ३१ नवीन रेशन कार्ड व ३७ आयुष्मान भारत कार्ड वितरण
- कृषी विभागामार्फत ३८ लाभार्थ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी
ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण कोळी यांनी जमिनीच्या अकृषक रूपांतरणासंदर्भातील नवीन नियमांची माहिती दिली. विकास आराखडा मंजूर असल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची अट शिथिल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या दिवशी World Sparrow Day निमित्त वन विभागाने चिमणी संवर्धनाबाबत जनजागृती केली. वाढत्या उन्हाळ्यात चिमण्यांसाठी पाणी व अन्नाची सोय करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार संभाजी पाटील, नायब तहसीलदार शिरीश परदेशी, निवासी नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, वनपरीक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, सीडीपीओ सागर चौधरी, माजी जि.प. सदस्य डॉ. भगवान पाटील, सरपंच युवराज ठाकरे, उपसरपंच सचिन बेदमुथा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्ती चौधरी यांनी केले, तर प्रास्ताविक लक्ष्मण कोळी यांनी मांडले. आभार प्रदर्शन तहसीलदार संभाजी पाटील यांनी केले.
एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.








