नेवासा प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथे बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत एकूण पाच शेळ्या ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास अक्षय बाळासाहेब शिंदे यांच्या गोठ्यात बिबट्याने तारेच्या कुंपणावरून उडी मारून प्रवेश केला. त्यानंतर गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला करत चार शेळ्यांचा फडशा पाडला. सकाळी गोठ्यात हालचाल दिसत नसल्याने पाहणी केली असता मृत शेळ्या आणि रक्ताने माखलेला परिसर पाहून शेतकऱ्यांना धक्का बसला.
या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी नानासाहेब अण्णासाहेब शिंदे यांची एक शेळी बिबट्याने ठार केली होती. त्यामुळे एकूण पाच शेळ्यांचा बळी गेला आहे.
परिसरात बिबट्याचा वाढता वावर पाहता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणे धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकरी करत आहेत.
दरम्यान, सुरेगाव (गंगा), बोरगाव, उस्थळ आणि बेलपांढरी या शिवारात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.








