बोगद्याच्या अभावी निष्पापाचा बळी; परिसरात संतापाची लाट
एरंडोल (प्रतिनिधी ) — राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका (कासोदा फाटा) येथे बोगद्याच्या अभावामुळे आणखी एका निष्पापाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दि. २२ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता भरधाव कंटेनरच्या धडकेत एरंडोल येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा आरटीओ एजंट मंगेश शिवदास पाटील (वय ६६, रा. पाटीलवाडा, एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश पाटील हे आपल्या दुचाकीने (क्र. MH 19 DX 1094) शेताकडे जात असताना अमळनेर नाका परिसरातील कासोदा फाटा क्रॉसिंग ओलांडत होते. यावेळी जळगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने (क्र. DD 01 S 9103) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की ते रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. मात्र, अपघातानंतर कंटेनर चालक वाहन सोडून पळून गेला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही वेळातच चालकाला ताब्यात घेतले आहे.
मंगेश पाटील हे एरंडोल येथील सन्माननीय व समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने पाटीलवाडा परिसरासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
दरम्यान, कासोदा फाटा (अमळनेर नाका) हे ठिकाण सध्या अपघाताचे केंद्र बनले आहे. येथे बोगदा नसल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. या ठिकाणी बोगदा उभारण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आली असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
“प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आज एका प्रतिष्ठित नागरिकाला जीव गमवावा लागला. याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरुद्ध कारवाई होणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील करीत आहेत.









