वैजापूर / प्रतिनिधी :
शिवना टाकळी सिंचन प्रकल्पातील कालव्याच्या रखडलेल्या कामावरून राज्याचे जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil ॲक्शन मोडवर आले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करून यंदाच धोंदलगाव-दहेगाव परिसरात पाणी पोहोचवण्याचे कडक आदेश दिले आहेत.
दि. २२ मार्च रोजी वैजापूर तालुक्यातील धोंदलगावसह परिसरातील ९ गावांतील शेतकऱ्यांनी लोणी येथे जाऊन मंत्री विखे पाटील यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले. शिवना टाकळी सिंचन प्रकल्पासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करूनही प्रत्यक्षात कालव्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.
निवेदनातील गांभीर्य लक्षात घेत मंत्री विखे पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता उपस्थितांसमोरच जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट फोन लावून जाब विचारला. “निधी मंजूर असूनही काम कासवगतीने का सुरू आहे? ९ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी या सर्व गावांना पाणी मिळालेच पाहिजे,” अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
तसेच ठेकेदारांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे का, किंवा अन्य तांत्रिक अडचणी आहेत का, याचीही चौकशी करत काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. “याच वर्षी पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात पोहोचले पाहिजे,” अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.
या निवेदनासाठी धोंदलगाव, भायगाव गंगा, उंदिरवाडी, नालेगाव, अमानतपूरवाडी, संजरपूरवाडी, परसोडा, करंजगाव व दहेगाव या ९ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “निधी असूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे आमचे वर्ष वाया जाण्याची भीती होती, मात्र मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे आता आमच्या पाणी प्रश्नाला गती मिळेल,” अशी अपेक्षा शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केली.
दरम्यान, मंत्री विखे पाटील यांच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे जलसंपदा विभागात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता प्रत्यक्षात कामाला किती वेग येतो आणि शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळते का, याकडे संपूर्ण वैजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.










