संगमनेर प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील ऋतुजा अशोक गायकवाड हिने UPSC परीक्षेत १०६ वी रँक मिळवत IAS पदावर निवड मिळवून तालुक्याचा मान उंचावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संगमनेर तहसील कार्यालयात तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार धिरज मांजरे यांनी ऋतुजाचे अभिनंदन करत तिच्या पुढील प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेऊन इतक्या मोठ्या पदावर पोहोचणे हे अत्यंत प्रेरणादायी असून, ग्रामीण भागातील मुला-मुलींनी ऋतुजाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी रायतेवाडीचे प्रशासक सरपंच हरिभाऊ मंडलिक, ऋतुजाचे वडील अशोक गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ऋतुजा गायकवाड हिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








