वर्ध्यात ‘पथदर्शक साहित्य पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात
वर्धा (प्रतिनिधी) : “मानवी कल्याणासाठी साहित्याचा उपयोग झाला पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये रुजविताना उद्देशाची स्पष्टता असणे अत्यावश्यक आहे. मानवी मूल्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन डॉ. अरविंद पाटील यांनी केले.
वर्धा येथील बजाज वाचनालय येथे पथदर्शी साहित्य संघ, विदर्भ प्रांत यांच्या वतीने आयोजित ‘पथदर्शक साहित्य पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा व ‘पथदर्शक’ या अनियतकालिकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सिद्धार्थ भगत आणि मार्शल धम्मा कांबळे उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ भगत यांनी “आंबेडकरी साहित्य निर्मितीची भूमिका” या विषयावर विचार मांडताना शिक्षणामुळे निर्माण झालेली सामाजिक जाणीव आणि कवितेद्वारे व्यक्त होणाऱ्या वेदना व प्रतिकार यावर भाष्य केले.
तर मार्शल धम्मा कांबळे यांनी “भारत राष्ट्र व्हिजन” या विषयावर बोलताना संविधानाने समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित राष्ट्र उभे केले असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात संजय ओरके यांनी आंबेडकरी साहित्याची दिशा ही माणसाच्या कल्याणासाठी असावी, असे मत व्यक्त केले.
या वेळी ‘राज्यस्तरीय पथदर्शक साहित्य पुरस्कार’ अंतर्गत सिराज करिम शिकलगार यांच्या ‘दिवान-ए-सिराज’ या गझलसंग्रहाला तसेच डॉ. अनंता सूर यांच्या ‘कोंडमारा’ या कथासंग्रहाला प्रत्येकी १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शेला व रोपटे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात ‘पथदर्शक’च्या नवव्या अंकाचे प्रकाशन तसेच क्यूआर कोडचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रोशन गजभिये यांनी केले, तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले.
या सोहळ्यास साहित्यिक, वाचक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










