अंदरसुल (प्रतिनिधी : सुनिल गायकवाड) : सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम देशातील एलपीजी गॅस पुरवठ्यावर होत असून त्याचा फटका शालेय पोषण आहार योजनेलाही बसत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक शाळांमध्ये पोषण आहार शिजविणे कठीण झाले असून काही ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
विद्यार्थ्यांना नियमित आणि वेळेवर पोषण आहार मिळावा, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शरदराव लोहकरे पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात येवला येथील तहसीलदारांना निवेदन सादर केले.
महाराष्ट्रात एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे शालेय पोषण आहाराचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक शाळांमध्ये गॅसअभावी स्वयंपाक करण्यासाठी पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आहार व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांचा आहार खंडित होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने गॅस कंपन्यांना शाळा व बचत गटांना सिलिंडर पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. एप्रिल २०२६ पर्यंत पुरवठा सुरळीत ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मुबलक प्रमाणात गॅस उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना नियमित आहार मिळेल, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.











