उमरखेड (प्रतिनिधी) : विडूळ येथे Rashtrasant Rajaram Maharaj Jadhav यांची जयंती उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला कैकाडी समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत कैकाडी महाराजांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रसंत राजाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रसंत राजाराम महाराज जाधव हे पंढरपूरचे महान वारकरी संत व समाजसुधारक होते. “माणसं व्हा” हा त्यांचा संदेश समाजाला आजही प्रेरणा देणारा आहे. त्यांनी पंढरपूर येथे कैकाडी महाराज मठाची स्थापना करून वारकरी संप्रदायाचा प्रसार केला तसेच भजनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा व जातिभेद निर्मूलनाचे कार्य केले. त्यांचे मूळ नाव राजाराम भागुजी जाधव असून त्यांचा जन्म १९०७ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथे झाला. २१ ऑक्टोबर १९७८ रोजी पंढरपूर येथे त्यांनी समाधी घेतली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंगेश भाऊ जाधव मित्र मंडळाने पुढाकार घेतला. मंगेश जाधव व राजू गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी पोलीस ठाण्याचे पीएसआय विनायक रामोड, जमादार चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंजाबराव भालेराव, पोलीस पाटील गजानन मुलगे यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. तसेच कैकाडी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जयंती उत्साहात साजरी केली.









