तहसीलदार उत्तम निलावाड यांचा पुढाकार; नागरिक व जनावरांसाठी दिलासा
मारेगाव | प्रतिनिधी :
तापत्या उन्हाळ्यात प्रत्येक जीवाला पाण्याची गरज ओळखून मारेगाव शहरात पाणपोई उभारण्यात आली असून या उपक्रमाला ‘स्मृती सेवा’चे स्वरूप देण्यात आले आहे. या पाणपोईच्या उभारणीसाठी तालुका तहसीलदार उत्तम निलावाड यांनी पुढाकार घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
“पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीवन दडलेले आहे. केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरांनाही पाण्याची तितकीच आवश्यकता असते,” अशी भावना व्यक्त करत तहसीलदारांनी या उपक्रमामागील सामाजिक जाणीव अधोरेखित केली.
ही पाणपोई पोलीस स्टेशनलगत असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाजूला उभारण्यात आली आहे. त्यामुळे रोज तालुक्याच्या ठिकाणी येणारे नागरिक, शाळकरी मुले तसेच परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय सहज उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमामुळे प्रशासनही समाजसेवेसाठी तत्पर असल्याचा संदेश मिळत असून, नागरिकांकडून तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, या पाणपोईमुळे उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेत सर्वसामान्यांसह जनावरांनाही मोठा दिलासा मिळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.








