जालना | प्रतिनिधी :
भोकरदन तालुक्यातील मौजे तडेगाव येथील दलित वस्तीत मुख्य रस्त्यावरील विद्युत खांब मोडकळीस आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खांब केव्हाही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, परिसरातील रहिवाशांमध्ये चिंता वाढली आहे.
या मार्गावरून दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा खांब धोकादायक ठरत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे महावितरण विभागाने तात्काळ लक्ष देऊन संबंधित खांबाची दुरुस्ती अथवा बदली करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.









