विशेष प्रतिनिधी :
प्रशासकीय कामकाजात माहिती-तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरामुळे कोल्हापूर जिल्ह्याने ई-गव्हर्नन्समध्ये आघाडी घेतली आहे. राज्य शासनाच्या ‘150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’च्या अंतिम मूल्यमापनात 200 पैकी 177 गुण मिळवत जिल्ह्याने राज्यात 5 वा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मंत्री आशिष शेलार व राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल :
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण उपक्रमांची विशेष दखल घेण्यात आली.
- ‘एआय-ऑफिस लेन्स’ उपक्रम : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कर्मचार्यांची स्वयंचलित हजेरी व प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालींचे विश्लेषण
- ‘कार्यालय कवच’ : पार्किंग व गर्दी व्यवस्थापनावर लक्ष
- ‘एआयमित्र’ प्रणाली : महसुली खटल्यांमध्ये गतिमानता व निर्णय प्रक्रियेत अचूकता
- ‘जेमिनी’ एआय टूल्स : क्लिष्ट प्रकरणांमध्ये कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी वापर
तसेच अंबाबाई मंदिर व जोतिबा यात्रेतील गर्दी नियंत्रणासाठी ‘एआय स्मार्ट क्राऊड मॅनेजमेंट’ प्रणालीद्वारे हीटमॅप्स वापरून रिअल टाईम मॉनिटरिंग केले जात आहे.
‘सेवादूत’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट :
नागरिकांच्या सोयीसाठी ‘सेवादूत’ (9096074799) हा व्हॉट्सअॅप चॅटबॉट कार्यान्वित करण्यात आला असून याद्वारे तक्रारी नोंदविणे व विविध दाखल्यांची माहिती मिळविणे शक्य झाले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी पावसाचे अपडेट्स व नद्यांची पाणी पातळीची माहितीही उपलब्ध करून दिली जाते.
जीआयएस मॅपिंगचा वापर :
आधार केंद्रे व रेशन दुकाने यांचे ‘गॅप अॅनालिसिस’ करण्यासाठी जीआयएस मॅपिंगचा वापर केल्याने ज्या ठिकाणी सुविधा नाहीत तेथे नवीन केंद्रे मंजूर करणे सुलभ झाले आहे. तसेच ‘महानेट’ ऑप्टिकल फायबर केबलमुळे रस्ते खोदाईवेळी होणारे नुकसान टाळण्यात मदत होत आहे.
या यशामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले.









