आजरा (प्रतिनिधी) :
आजरा नगरपंचायतीमधील कचरा व्यवस्थापनाचा गंभीर बनलेला प्रश्न आणि प्रलंबित विकासकामांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांची भेट घेतली. यावेळी शहराच्या आरोग्यासाठी व मूलभूत सुविधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
कचरा व्यवस्थापनाचे संकट :
आजरा शहराची स्थायी लोकसंख्या सुमारे २४ हजार असून दररोज १४ ते १५ हजार तरंगती लोकसंख्या शहरात येत असते. शहराची भौगोलिक रचना गुंतागुंतीची असल्याने कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सध्याच्या स्थितीत
- नगरपंचायतीकडे मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची कमतरता
- जुन्या कंत्राटाची मुदत संपली असून नवीन निविदा प्रक्रियेत अडथळे
- शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्न गंभीर
या समस्यांवर उपाय म्हणून नगरविकास विभागाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’ अंतर्गत विशेष निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
वॉर्ड क्र. १५ मधील विकासकामे :
नगरसेवक परशुराम बामणे यांनी उर्वरित गटार बांधकाम व रस्त्यांसाठी स्वतंत्र निधीची मागणी पालकमंत्र्यांकडे केली.
रस्ते व पाणीपुरवठ्यावर चर्चा :
शहरातील रस्त्यांच्या स्थितीबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत “रस्ते अद्याप पूर्ण का झाले नाहीत?” असा सवाल उपस्थित केला. यावर समितीकडून सांगण्यात आले की,
- काही रस्ते अद्याप अपूर्ण आहेत
- पूर्ण झालेल्या रस्त्यांमधून पाण्याच्या पाईपलाईन गेल्या आहेत
- गळती दुरुस्तीसाठी नव्याने रस्ते फोडावे लागत असल्याने रस्त्यांची अवस्था खराब होत आहे
पालकमंत्र्यांची ग्वाही :
शिष्टमंडळाच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कचरा, रस्ते व पाणीपुरवठ्याचे प्रश्न लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
या भेटीवेळी परशुराम वैजू बामणे, डॉ. स्मिता कुंभार (परळकर), डॉ. श्रद्धानंद ठाकूर, सुधीर कुंभार, अतुल पाटील, मयूर परळकर, अमोल जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.









