श्रीगोंदा (प्रतिनिधी) :
सम्राट अशोकाने तलवारीऐवजी प्रेम, न्याय आणि विश्वासाच्या जोरावर जग जिंकले, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक प्रशांत चव्हाण यांनी केले. ते राहुल विद्यार्थी वसतीगृह, श्रीगोंदा येथे आयोजित जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शांताराम उबाळे होते.
प्रशांत चव्हाण पुढे म्हणाले की, जगाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले, मात्र मोजक्याच राजांना जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले आहे. त्यामध्ये सम्राट अशोक हे एक महान शासक होते, ज्यांनी युद्धाऐवजी प्रेमाने प्रजेचे मन जिंकले.
भगवान बुद्धांच्या धम्माच्या आधारे त्यांनी लोककल्याणकारी राज्यव्यवस्था उभारली, तसेच आशिया खंडात धम्माचा प्रसार करून जगभरात आदराचे स्थान मिळवले. त्यांच्या कारकिर्दीत रस्ते, तलाव, विहिरी, बंधारे उभारणे, शेतीसाठी जमीन वाटप करणे, आरोग्यशाळा व शिक्षणासाठी पाठशाळा सुरू करणे असे अनेक लोकहिताचे उपक्रम राबविण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर उपस्थितांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सतीश ओहोळ, विनायक ससाणे, भारत आल्हाट, मच्छिंद्र पाटोळे, लालन शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब राजपूत यांनी केले, तर आभार प्रेम जाधव यांनी मानले.











