करमाळा (प्रतिनिधी) :
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्थानकाला एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळावा, या मागणीसाठी नागरिकांचा लढा तीव्र होत असून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
जेऊर रेल्वे स्थानक हे करमाळा, जामखेड, परांडा तसेच परिसरातील ४० ते ५० गावांसाठी महत्त्वाचे दळणवळण केंद्र आहे, मात्र येथे प्रमुख एक्सप्रेस गाड्या न थांबल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही प्रवाशांना इतर स्थानकांवर जावे लागत असल्याने वेळ व पैशांचा अपव्यय होत आहे.
विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसत असून नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
या मागणीसाठी निवेदने, मोर्चे आणि आंदोलने करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, त्यामुळे “हक्कासाठी लढा तीव्र करावा लागेल” अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
प्रवासी संघटनांची मागणी :
- जेऊर स्थानकावर किमान ‘हुतात्मा एक्सप्रेस’ व ‘दयान एक्सप्रेस’ यांना तातडीने थांबा देण्यात यावा
अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
करमाळा तालुक्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या या मागणीवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेचा रोष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










