जामखेड (प्रतिनिधी) :
तालुक्यातील जवळा स्टेशन परिसरातील भीषण वीज समस्येविरोधात शेतकरी आक्रमक होत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्त्या आरती दीपक देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे शेती व घरगुती वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध केला.
मुख्य समस्या :
- कमी दाबाने वीज पुरवठा
- वारंवार वीज खंडित होणे
- जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेवर न बदलणे
या समस्यांमुळे पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
महावितरण अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि जवळा स्टेशन परिसरातील तांत्रिक अडचणी दूर करून वीज समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले.
प्रशासनाने १५ एप्रिलपर्यंत मुदत मागितली असून त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात जवळा परिसरातील शेकडो शेतकरी, तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.










