पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पवना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या अनेक वस्त्या तसेच काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील नाले आणि ओढे काठोकाठ भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अंतर्गत रस्ते बंद झाले आहेत. परिणामी वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, नदीकाठच्या भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
