कर्जत-खोपोली कार्यकर्त्यांना महेंद्रशेठ घरत यांचे मार्गदर्शन; संगठन सृजन अभियानाला व
उरण, दि. ३० :
कॉंग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी नेहरू-गांधी यांच्या विचारांची आजही गरज असून, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला बळकटी देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी केले.
कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रदेश काँग्रेसच्या ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत नेरळ येथील साने हॉलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले की, कॉंग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष असून त्याची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. “सध्या रायगड जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीतही कार्यकर्त्यांच्या बळावर आपण चांगले यश मिळवत आहोत. येत्या काळात पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस प्रदीप राव, मनीष गणोरे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. श्रद्धा ठाकूर, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.










