पालम | प्रतिनिधी :
पालम तालुक्यात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या घराघरात पाणी पुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, या योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
दि. २८ मार्च २०२२ पासून या योजनेच्या कामास सुरुवात झाली असली तरी अनेक गावांमध्ये आजपर्यंत पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. कामाच्या दरम्यान कोणतेही अधिकारी किंवा अभियंते प्रत्यक्ष पाहणीसाठी उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी अनेक ठिकाणी अर्धवट व निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे समोर येत आहे.
या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध असूनही कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे कामे रखडल्याचे चित्र आहे. पवार कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून काम सुरू असूनही ग्रामस्तरावर पुरेशी हालचाल नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सुमारे १ कोटी ६७ लाख रुपयांच्या या योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत असून, स्वच्छ व फिल्टर पाणी नागरिकांना कधी उपलब्ध होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली असता बजेट नसल्याचे कारण सांगण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष वाढला आहे. अनेक गावांतील नागरिकांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी केली असून, अन्यथा उपोषणाचा इशाराही दिला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.









