पालम | प्रतिनिधी :
ग्राहकांनी बाजारपेठेतून वस्तू खरेदी करताना जागरूक राहणे अत्यंत आवश्यक असून, फसवणूक टाळण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूची पावती घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार शितल खडसे यांनी केले.
पालम तहसील कार्यालयाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त ‘ग्राहक जागरण पंधरवडा’ अंतर्गत दि. ३० मार्च रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शितल खडसे होत्या.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी जिल्हा उपाध्यक्ष भगवान करंजे यांनी ग्राहकांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे, शहराध्यक्ष धोंडीराम कळंबे, रास्त भाव दुकानदार तालुका अध्यक्ष मारोतराव नाईकवाडे, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष राम गावंडे, उतमराव भस्के, प्रा. माधव बैकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
“सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासी ग्राहक” ही यावर्षीची संकल्पना ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा विभागातील कर्मचारी सोडगिर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिल्पा शिवनकर, दिलदार, पोर्णीक, महेपतराव कांबळे, माधव कांबळे आदींनी परिश्रम घेतले.







