राजाराम | प्रतिनिधी :
आदिवासी विविध सहकारी संस्थेमार्फत उशिरा सुरू झालेल्या धान खरेदी केंद्रामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान शिल्लक राहिले असून, विक्री केलेल्या धानाचे बिलिंग व चुकारेही प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी माजी सभापती भास्कर तलांडे यांनी केली आहे.
धानाचे पैसे वेळेत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जफेड करणे कठीण झाले आहे. अनेक शेतकरी कर्ज फेडण्यासाठी घरातील दागिने गहाण ठेवून किंवा उसनवारी करून पैसे उभे करत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी धानाचे चुकारे मिळताच शेतकरी कर्ज फेड करत असतात, मात्र यावर्षी बिलिंग व पैसे न मिळाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
धानाचे बिलिंग व चुकारे वेळेत न मिळणे ही गंभीर बाब असून, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीत उर्वरित धान खरेदी पूर्ण करण्यासाठी तसेच कर्जफेडीसाठी आवश्यक तेवढी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








