पातुर प्रतिनिधी
आलेगाव:
गेल्या वर्षी पावसाळ्यात आलेल्या भीषण पुरामुळे निर्गुणा नदीवरील पुलाचे अपघात संरक्षक कठडे वाहून गेले होते. या गंभीर घटनेला आता तब्बल एक वर्ष पूर्ण झाले असतानाही संबंधित प्रशासनाकडून अद्याप नवीन कठडे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून तातडीने कठडे बसविण्याची मागणी केली जात आहे.
हा पूल परिसरातील मुख्य वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा मानला जातो. दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी वाहने तसेच पादचारी या पुलाचा वापर करतात. मात्र पुलावरील संरक्षक कठडे नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेषतः पावसाळ्यात नदीची पातळी वाढल्यानंतर आणि रात्रीच्या अंधारात पुलाचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने या पुलावर मजबूत संरक्षक कठडे बसवावेत. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
