आजरा (प्रतिनिधी):
समाज प्रबोधनासाठी शाहिरीचा प्रभावी वापर करणारे ख्यातनाम शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा मानाचा ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार समितीचे ज्येष्ठ सदस्य मुकुंददादा देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
पुरस्काराची माहिती देताना देसाई यांनी सांगितले की, संभाजी भगत हे बंडखोर शाहिरीचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व असून त्यांनी लोकशाहीर गव्हाणकरांचा वैचारिक वारसा पुढे नेला आहे. त्यांच्या शाहिरीतून कामगार, कष्टकरी, दलित आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांना आवाज मिळतो. जातीय, वर्गीय आणि लैंगिक शोषणावर त्यांच्या कलेतून घणाघाती प्रहार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संभाजी भगत यांनी पोवाडे, भारुडे, ओवी आणि अभंग यांसारख्या पारंपरिक लोककलांमध्ये क्रांतिकारक विचार मांडत जनजागृती केली आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून ‘कातळखालचे पाणी’, ‘अडगळ’, ‘तोड ही चाकोरी’, ‘रणहलगी’ यांसारख्या कलाकृती लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांनी संगीत दिलेल्या ‘कोर्ट’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
यापूर्वीही त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून आगामी सातारा येथे होणाऱ्या ‘विद्रोही साहित्य संमेलनाचे’ अध्यक्ष म्हणूनही ते कार्यभार सांभाळणार आहेत.
या घोषणावेळी जि.प. सदस्य सुधीरभाऊ देसाई, कार्याध्यक्ष संपत देसाई, सचिव सुनील पाटील, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. मीना मंगळूरकर, युवराज पोवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.







