बांबरुड राणीचे (प्रतिनिधी):
गेल्या दोन दिवसांपासून बांबरुड राणीचे परिसरात वादळी वाऱ्याचा जोर कायम असून, यामुळे ज्वारी व मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभे पीक जमीनदोस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्या कापणीस तयार असलेल्या पिकांना मजुरांच्या अभावामुळे वेळेत काढणी करता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. त्यातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत असून, आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.
अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकरी त्रस्त झाले असून, पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
वादळी वाऱ्याचा हा कहर आणखी काही दिवस सुरू राहिल्यास नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






