आजरा (प्रतिनिधी):
सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जनता सहकारी बँक लि. आजरा या बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भक्कम झेप घेतली आहे. बँकेने ९ कोटी ९१ लाख रुपयांचा करपूर्व नफा मिळवला असून ४७५ कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी दिली.
मार्च २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण ठेवी ४७६ कोटी १० लाख रुपयांवर पोहोचल्या असून एकूण कर्जवाटप २९२ कोटी ३६ लाख रुपये आहे. बँकेची गुंतवणूक २२५ कोटी ५५ लाख रुपये असून एकूण व्यवसाय ७६८ कोटी ४६ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे बँकेचा एनपीए शून्य टक्के असल्याने बँकेचा पारदर्शक आणि सक्षम कारभार अधोरेखित झाला आहे. सीडी रेशो ६१.४७ टक्के तर सीआरएआर १५.२१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी बँकेने कोल्हापूर येथे अद्ययावत डेटा सेंटर सुरू केले आहे. सध्या कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे आणि मुंबई परिसरात बँकेच्या २१ शाखा कार्यरत असून, रिझर्व्ह बँकेकडून कल्याण शाखेला मंजुरी मिळाल्याने विस्ताराला आणखी गती मिळणार आहे.
बँकेच्या यशात कर्मचारी आणि सभासदांचा मोठा वाटा असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के बोनस आणि रजेच्या पगाराची तरतूद करण्यात आली आहे. आगामी वर्षात ५५० कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार चेअरमन मुकुंददादा देसाई आणि सीईओ एम. बी. पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी व्हाईस चेअरमन अमित सामंत, संचालक महादेव टोपले, रणजित देसाई, जयवंत शिंपी, बाबाजी नाईक, शिवाजी पाटील, विक्रमसिंह देसाई यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







