उदगीर : प्रतिनिधी
उदगीर मतदारसंघातील सर्व धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला असून, आगामी काळातही या कामाला प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केले. ते नांवदी (ता. उदगीर) येथील श्री मलयाप्पा मंदिराच्या कळशारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध गावांमधील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी काम करण्यात आले आहे. श्री मलयाप्पा मंदिराला ये-जा करण्यासाठीचा रस्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून लवकरच विकसित केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पुढे बोलताना आ. बनसोडे म्हणाले की, “आपल्याला समृद्ध धार्मिक वारसा लाभला आहे. भक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती असून, ईश्वराच्या नामस्मरणातून मनाला शांती आणि ऊर्जा मिळते.” त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी श्री मलयाप्पा मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केल्याचेही सांगितले.
“जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मला दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. ‘जे जे नव ते ते उदगीरला हवं’ या ध्येयाने काम करत विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार,” असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास लातूर जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सरपंच ब्रह्मजी केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच उदगीर व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








