उदगीर : प्रतिनिधी
तालुक्यातील नावंदी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘विशेष डिजिटल शेतीशाळा’ मोठ्या उत्साहात पार पडली. अध्यात्माच्या व्यासपीठावरून आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव उपक्रम यशस्वी ठरला असून, शेकडो शेतकऱ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयश यादव, तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे, उपकृषी अधिकारी चव्हाण, तंत्रज्ञान समन्वयक शेंडगे तसेच नावंदीचे सरपंच ब्रम्हाजी केंद्रे उपस्थित होते.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शेतीशाळेत ‘पेरणीपूर्व तंत्रज्ञान’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये बेड पद्धतीने लागवड, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, तसेच बीजप्रक्रिया व बीज उगवण चाचणी यांचे महत्त्व डिजिटल माध्यमातून शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.
सप्ताहाच्या ठिकाणी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आल्यामुळे कीर्तनासाठी जमलेल्या भाविक-शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयश यादव यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. तर तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी “भक्ती आणि शेतीतंत्रज्ञानाचा हा संगम शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा आहे,” असे सांगत बीजप्रक्रिया करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी तंत्रज्ञान समन्वयक शेंडगे यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. सरपंच ब्रम्हाजी केंद्रे यांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.
या उपक्रमामुळे नावंदी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयक जागरूकता वाढून नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली आहे.








