धाराशिव (प्रतिनिधी): शहरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग आणि बसस्थानक परिसरात मुलींना टवाळखोरांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर निर्भय पथक आणि पिंक पथकाची गस्त वाढवणे, महिलांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करणे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे या मागण्या नगराध्यक्षा काकडे यांनी मांडल्या.
पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत महिला सुरक्षा हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. शहरातील असुरक्षित ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्या भागात अधिक कडक बंदोबस्त आणि नियमित गस्त ठेवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून धाराशिव शहर महिलांसाठी अधिक सुरक्षित, निर्भय आणि विश्वासार्ह बनवण्याचा उद्देश असल्याचे नगराध्यक्षा नेहाताई काकडे यांनी नमूद केले.
या बैठकीला कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे तसेच धाराशिव नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती वैशालीताई सुशांत सोनवणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. शहरातील महिला सुरक्षेसाठी घेतलेल्या या निर्णयांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.









