धाराशिव (प्रतिनिधी): जिल्ह्यातील तरुणांना स्वावलंबी बनवून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून २०२६-२७ या आर्थिक वर्षात १०८ नवीन उद्योजक घडवण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार असून, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
या उपक्रमांतर्गत केवळ उद्योग सुरू करण्याचे मार्गदर्शनच नव्हे, तर तो यशस्वीपणे उभा राहावा यासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. उद्योगासाठी आवश्यक प्रकल्प अहवाल तयार करून देणे, बँकांमार्फत सुलभ कर्ज व अनुदान मिळवून देणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केले जाणार आहे. याशिवाय उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही मदत केली जाईल.
प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असून, इच्छुकांच्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या मोहिमेत कृषी आधारित, पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये शेळीपालन, कडबाकुट्टी, कांदा व चिंच पावडर निर्मिती, प्लास्टिक रिसायकलिंग, बायोमास इंधन, अगरबत्ती निर्मिती, इ-वेस्ट व लिथियम बॅटरी स्क्रॅप रिसायकलिंग, तसेच कोकोपीट व पारंपरिक उद्योगांचा समावेश आहे.
या योजनेसाठी इच्छुकांनी १ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान 8888627777 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप किंवा संदेशाद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी ‘प्रतिष्ठान भवन, धाराशिव’ येथे विशेष परिषद आयोजित करण्यात येणार असून, निवड झालेल्या उद्योजकांना पुढील दिशा दिली जाणार आहे.
“तरुणांनी नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे बनावे,” या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यात हजारो कुटुंबांना रोजगार मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.








