श्रीगोंदा (प्रतिनिधी) :
महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी श्रीगोंदा तालुक्यात होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दि. ३ एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’च्या शासकीय सुट्टीच्या दिवशीही प्रशासन व शेतकरी यांच्यात समन्वय साधत बन पिंपरी–मांडवगण येथील शिवरस्त्याचे सीमांकन यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. या उपक्रमामुळे श्रीगोंदा तालुका राज्यासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे मानले जात आहे.
मागील आठवड्यात बन पिंपरी येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रशासनाशी संवाद साधून रस्ता मोकळा करण्यासाठी ठोस तारीख निश्चित केली होती.
उपविभागीय अधिकारी कुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे, भूमी अधीक्षक अविनाश मिसाळ यांच्या आदेशानुसार दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोजणी अधिकारी वासुदेव पाटील यांनी सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली. या वेळी मंडळ अधिकारी संतोष ढगे, ग्राम अधिकारी सय्यद, मांडवगण शेलार एम.पी., बन पिंपरी येथील सय्यद शाहरूख, सरपंच पठारे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
प्रशासन व शेतकरी यांच्या समन्वयातून हे काम सुरळीत पार पडल्याबद्दल दादासाहेब जंगले पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. “शासन निर्णयाची खरी ताकद प्रत्यक्ष अंमलबजावणीतूनच दिसून येते,” असे त्यांनी सांगितले.
‘शेत तिथे रस्ता’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत श्रीगोंदा तालुका राज्यासाठी आदर्श निर्माण करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.











