आजरा (प्रतिनिधी) :
आजरा शहर आणि संपूर्ण तालुक्यात अमली पदार्थांच्या तस्करीने गंभीर स्वरूप धारण केले असून गांजाची उघडपणे विक्री होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, सातवी-आठवीतील शालेय विद्यार्थीही या व्यसनाच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. काही सराईत गुन्हेगारांकडून या कोवळ्या वयातील मुलांना जाणीवपूर्वक व्यसनाकडे वळवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नशेच्या प्रभावाखाली किरकोळ वादातून हाणामारी, चोरी आणि गंभीर गुन्ह्यांपर्यंत घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी वाहनांतून इंधन चोरी, शेतातील औजारे व घरगुती वस्तूंची चोरी अशा घटनांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी दुचाकींच्या माध्यमातून गांजाची घरपोच विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या कारवायांवर कारवाई झाली तरी राजकीय दबावामुळे आरोपी सुटून जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून गांजाच्या पुरवठा साखळीचा छडा लावावा तसेच विशेष अँटी-ड्रग पथक स्थापन करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.











