आजरा (विशेष प्रतिनिधी) :
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या विचाराला कृतीत उतरवत राज्यातील कर्तव्यनिष्ठ सनदी अधिकारी Tukaram Mundhe यांनी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. मातोश्रींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींचे पारंपरिक नदी विसर्जन न करता, त्यातून ‘स्मृती वृक्ष’ लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सामान्यतः अंत्यसंस्कारानंतर अस्थी विसर्जनाची परंपरा असते. मात्र जलप्रदूषण टाळणे आणि निसर्गाशी नाते दृढ करणे या हेतूने मुंढे यांनी आईच्या अस्थी व रक्षा यांचा उपयोग करून एक रोपटे लावले आहे. हे रोपटे आता त्यांच्या आईच्या आठवणींचे जिवंत प्रतीक म्हणून वाढणार आहे.
या निर्णयामागे पर्यावरण संवर्धनाचा संदेश असल्याचे मानले जात असून, जलप्रदूषण रोखण्यासोबतच निसर्गाशी भावनिक नाते जपण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. “आईची माया आणि वृक्षाची सावली हे दोन्ही जीवनाला शांती देतात,” अशी भावना या उपक्रमातून व्यक्त होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तुकाराम मुंढे हे त्यांच्या शिस्तप्रिय व तत्त्वनिष्ठ कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. त्यांच्या या वैयक्तिक निर्णयामुळे पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विचारांची नवी दिशा मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
हा उपक्रम जुन्या रूढींना पर्याय देत पर्यावरणपूरक श्रद्धांजलीचा नवा पायंडा ठरत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.










