उदगीर (प्रतिनिधी) :
Udgir शहरातील गांधी नगर व मुसा नगर परिसरात ४ एप्रिलच्या रात्री दोन गटांमध्ये अचानक वाद उसळून तुफान दगडफेक झाली. या घटनेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता संतप्त जमावाने पोलीस जीपवरही दगडफेक करत मोठे नुकसान केले.
या प्रकरणी पोलीस अंमलदार सतीश भानुदास पवार यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे ५० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून काही आरोपींची नावे स्पष्ट करण्यात आली आहेत, तर इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
पोलीस सूत्रांनुसार, मौलाना आझाद शाळेजवळ रात्री सुमारे ११ वाजता आरोपींनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवला. त्यानंतर दगडफेक करत पोलिसांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत पोलिसांच्या शासकीय वाहनाचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.








