उदगीर (प्रतिनिधी) :
Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti च्या उदगीर शाखेच्या वतीने कार्यकर्ता संवाद बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस उदगीर शाखा अध्यक्ष प्रा. मनोहर पटवारी, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दशरथ भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रा. बाबूराव माशाळकर, जिल्हा प्रधान सचिव बळीराम भुकतरे, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे गुरुजी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात रघुनाथ मोरे (शेल्हाळ) यांच्या स्वागत गीताने झाली. प्रस्ताविक विश्वनाथ मुडपे गुरुजी यांनी केले, तर प्रा. बाबूराव माशाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी उदगीर शाखेच्या कार्याचे कौतुक करत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची गरज अधोरेखित केली. तसेच काही अंधश्रद्धाजन्य घटनांवर राजकीय नेत्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मनोहर पटवारी यांनी समारोप करताना युवकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. बळीराम भुकतरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप “हम होंगे कामयाब” या गीताने करण्यात आला.








